उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली. अलीच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल...
....
मोहम्मद आमिर अलीने २०१८ मध्ये शामरिक मोटर्स ही कंपनी सुरू केली. बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार करणं या उद्देशाने त्याने या कंपनीचा पाया रचला. स्वस्त आणि झटपट चार्ज होणाऱ्या दुचाकी बनवण्याची अलीची इच्छा होती; पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अलीने जामिया मिलिया इस्लामियामधून इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्याला ७० लाख रुपयांचं पॅकेज मिळणार होतं. एका अमेरिकन कंपनीने त्याला ही ऑफर दिली होती. वर्षाला ७० लाख रुपये कमावण्याची स्वप्न कोण बघत नाही? अलीचं स्वप्न वयाच्या २४ व्या वर्षीच पूर्ण होणार होतं. ऐषोआराम त्याची वाटत बघत होता. अली श्रीमंत होणार होता; पण त्याने ही ऑफर नाकारली. नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्षेत्रात अत्यंत निपुण असणाऱ्या अलीला वेगळी वाट निवडायची होती.
अली गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये हुशार होता. सुरुवातीला तो हिंदी माध्यमात शिकला. मग त्याला ऊर्दू माध्यमात घालण्यात आलं आणि अखेरीस तो इंग्रजी माध्यमात दाखल झाला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं अलीला खूप कठीण गेलं. अलीला विज्ञानाची प्रचंड आवड होती. अलीने लहानपणापासूनच वडिलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करताना बघितलं होतं. विज्ञानाची गोडी वाढत चालली होती. बऱ्य च प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. म्हणूनच त्याने बारावीनंतर इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचं ठरवलं. जेईई परीक्षाही दिली; पण दुर्दैवाने अलीला कमी गुण मिळाले. गुणांच्या बळावर त्याला प्रवेश मिळू शकणार नव्हता. अलीला आर्किटेक्चरला प्रवेश घेता आला असता; पण विज्ञानाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्याने एक वर्ष विश्रांती घेतली. त्यानंतर २०१५ मध्ये जामिया मिलिया इस्लामियामध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेतला.
२०१७ मध्ये वडील आणि मित्रांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या बळावर मारुती ८०० विकत घेतली. त्याने या गाडीचं रुपांतर इलेक्ट्रिक कारमध्ये केलं. त्याची प्रतिकृती तयार होती. हा प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने त्याने आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले; पण सुरुवातीला कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. उलट मस्करीच केली. कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाने त्याला मदत करायची तयारी दाखवली.
वार्षिक परीक्षेआधी एक अमेरिकन कंपनी या कॉलेजमध्ये आली. त्यांना अलीच्या शोधाबद्दल कळलं होतं. या कंपनीने त्याला ७० लाख रुपयांचं पॅकेज देण्याची तयारी दाखवली; पण अलीने ही संधी नाकारली. भारतात राहून देशासाठी, समाजासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने त्याने ही कंपनी सुरू केली. अलीच्या या निर्णयाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.